कोपरगाव बसस्थानकासाठी लागणाऱ्या वीजपुरवठ्यात गैरव्यवहार ? जनतेच्या पैशातून बगलबच्च्यांना ठेके देण्याचा कट

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगावमध्ये बस स्थानकातील चार्जिंग स्टेशनसाठी वीजपुरवठ्याच्या नियोजनात एक गंभीर प्रकार समोर आला असून, जनतेच्या पैशाचा अनाठायी वापर करून काही राजकीय शक्तीचा निवडक लोकांना फायदा देण्याचा कुटील डाव असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. बसस्थानकाला वीजपुरवठा करण्यासाठी शहरातच एस.एस.जी.एम. महाविद्यालयाच्या समोर १३२ के.व्ही क्षमतेचे कार्यरत सक्षम वीज सबस्टेशन उपलब्ध आहे. या ठिकाणाहून थेट वीजपुरवठा केल्यास अंतर कमी,खर्च कमी आणि कोणताही तांत्रिक अडथळा न येता सुरळीत सेवा मिळू शकते. हेच सर्वार्थाने फायदेशीर आणि शासकीय नियोजनाच्या दृष्टिकोनातूनही योग्य ठरणारे पर्याय आहे.पण आश्चर्याची बाब म्हणजे, पदाचा वापर करून काही राजकीय शक्ती जाणीवपूर्वक या सोप्या मार्गाकडे दुर्लक्ष करून औद्योगिक वसाहत मधून दूर अंतरावरून वीजलाइन टाकण्याचा अट्टाहास करत आहेत. हा मार्ग केवळ अव्यवहार्यच नव्हे, तर औद्योगिक वसाहतीतील वीजभार वाढवून तिथे आधीपासून संघर्ष करणाऱ्या उद्योजकांना अडचणीत आणणारा आहे.औद्योगिक वसाहत ही कोपरगावचा उद्योजकीय आत्मा आहे. अनेक होतकरू उद्योजक तिथे छोट्या-मोठ्या उद्योगांच्या माध्यमातून रोजगार निर्माण करत आहेत.

अशा ठिकाणी अतिरिक्त भार टाकणे म्हणजे त्यांचा भविष्यातील वीजपुरवठा धोक्यात आणणे होय. यामुळे वसाहतीतील प्रकल्पांना अडथळे निर्माण होतील, वाढती खर्चिकता आणि तांत्रिक अडचणींमुळे अनेक योजनेतील व्यवसाय बंद होण्याचे संकट येईल.या पार्श्वभूमीवर, हे स्पष्ट होते की औद्योगिक वसाहतीतून वीज देण्यामागे काही राजकीय शक्ती यांनी निवडक सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर मार्फत एम एस इ बी च्या कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून स्वतःचे ठेकेदार किंवा बगलबच्च्यांना फायदेशीर ठरावे असा लाभ देण्याचा प्रयत्न सुरू आहे. जनतेच्या पैशातून, विकासाच्या नावाखाली काहींचा फायदा करण्याचा हा प्रकार दुर्दैवी आहे. प्रशासनाने त्वरित या प्रकाराची दखल घेऊन, वीजपुरवठा केवळ आणि केवळ एस.एस.जी.एम. कॉलेज समोरील सब स्टेशन मधूनच करावा, अशी उद्योजक आणि सर्वसामान्य कोपरगावकरांची मागणी आहे. अन्यथा या संपूर्ण प्रकारात लपलेले हितसंबंध आणि भ्रष्ट डावसुद्धा योग्य वेळी जनतेसमोर आणले जातील.