अतिवृष्टीग्रस्तांना नुकसान भरपाई म्हणून तातडीची मदत उपलब्ध करून द्यावी – विभागीय आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव तालुक्यातील गावातील नुकसानीची पाहणी व पीक पंचनामे झाल्यानंतर शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणारच आहे. तोपर्यंत शेतकऱ्यांच्या कुटुंबात झालेली जिवितहानी, घराची पडझड, पशुधन हानी याची भरपाई म्हणून तातडीची मदत उपलब्ध करून द्यावी,अशा सूचना नाशिक विभागीय आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.कोपरगाव तालुक्यातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या चांदेकसारे, कोकमठाण यासह इतर गावातील शेतपीके व नुकसानीची त्यांनी पाहणी केली.

शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना दिलासा दिला. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया,शिर्डी अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत,तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे आदी उपस्थित होते.तसेच कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथे सोयाबीन शेती पीके, कोकणठाण येथे जगन्नाथ लोंढे, शिवाजी रक्ताटे, दगूनाथ गायकवाड, संजय लोंढे आदी शेतकऱ्यांशी संवाद साधत सोयाबीन, मका,ऊस या पीकांच्या झालेल्या नुकसानीची त्यांनी पाहणी केली.या अतिवृष्टी पाहणी दौऱ्यात विभागीय आयुक्तांनी पीक पंचनामे, ई-पीक पाहणी, बाधित क्षेत्र,

पीक विमा योजना, ॲग्रीस्टॅक योजनेत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची संख्या आदी माहिती प्रशासनाकडून जाणून घेतली. तसेच शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याची कार्यवाही करण्यात यावी. आवश्यक असल्यास स्थानिक नागरिक, व शेतकऱ्यांचे सहकार्य घेण्यात यावे, अशा सूचना ही डॉ.गेडाम यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या.