कोपरगाव शहराला तीन दिवसाआड पाणीपुरवठा सुरु व्यापाऱ्यांनी केला आ.आशुतोष काळेंचा सत्कार

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव शहराला रविवार (दि.२२) पासून तीन दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे महिलांचे चिंतेचे ढग कायमचे दूर झाले असून शहरातील व्यापाऱ्यांमध्ये देखील आनंदाचे वातावरण आहे. पाणी प्रश्न सुटल्यामुळे निश्चितच व्यवसाय वृद्धी होणार आहे त्यामुळे कोपरगाव शहरातील व्यापाऱ्यांनी आ. आशुतोष काळे यांचा सत्कार करून त्यांचे आभार मानले आहे.ज्या प्रश्नामुळे कोपरगाव शहराचा विकास खुंटला होता व महिलांसाठी देखील रोजचेच मडे, त्याला कोण रडे अशी अवस्था झाली होती. असा जटील पाणी प्रश्न आ. आशुतोष काळे यांनी सोडविल्यामुळे कोपरगाव शहराला तीन दिवसाआड स्वच्छ पाणी पुरवठा सुरु झाला आहे. त्यामुळे कोपरगावच्या महिला आनंदित झाल्या आहेच परंतु हा पाणी प्रश्न कायमचा सुटल्यामुळे शहरातील व्यवसायाला देखील चालना मिळणार आहे. त्याबद्दल कोपरगाव शहरातील व्यापाऱ्यांनी आ. आशुतोष काळे यांचा सत्कार केला.सत्काराला उत्तर देतांना आ.आशुतोष काळे म्हणाले की, दिलेला शब्द पूर्ण केला याचा विशेष आनंद आहे. काही अदृश्य शक्तींनी जरी ५ नं.साठवण तलाव होवू नये व शहराची तहान भागू नये यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले असले तरी माझ्या प्रामाणिक प्रयत्नातून व कोपरगावकरांच्या सहकार्यातून हा प्रश्न सुटला आहे. मला त्रास जरूर झाला, अडचणी देखील आणल्या गेल्या मात्र कोपरगावकरांची तहान भागवायचीच असा निश्चय केल्यामुळे विरोधक देखील पाणी प्रश्न सोडविण्यापासून मला रोखू शकले नाही. कोपरगाव शहराच्या विकासाच्या अनेक संकल्पना सत्यात उतरावायच्या असून यापुढे असेच सहकार्य ठेवा असे आवाहन केले.यावेळी व्यापाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त करतांना सांगितले की, पाणी प्रश्न रखडल्यामुळे कोपरगाव शहराच्या बाजारपेठेला मरगळ आली होती. व्यापारी वर्गाने हि मरगळ दूर होईल याची अपेक्षा जवळपास सोडली होती. कारण पाणी प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित होता त्याच बरोबर कोपरगाव शहर देखील धुळगाव झाले होते. परंतु २०१९ च्या विधानासभा निवडणुकीत विजयश्री गळ्यात पडल्यापासून आ.आशुतोष काळे यांनी दोनच महिन्यात ५ नं.साठवण तलावाचे काम सुरु केले. कोपरगाव शहराच्या विकासाला देखील मोठ्या प्रमाणावर निधी दिल्यामुळे कोपरगावचा विकास होवून बाजारपेठेतील आर्थिक उलाढाल वाढली आहे. यावरून कोपरगाव शहराची अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येत असल्याचे सिद्ध होत असून हा बदल पाणी प्रश्न सुटल्यामुळे व झालेल्या शहर विकासामुळे शक्य झाला आहे. यासाठी ज्यांचे योगदान आहे त्यांचेप्रती कृतज्ञता व्यक्त करणे आमचे कर्तव्य असून त्यामुळे त्यांच्याकडून कोपरगावचा यापेक्षा जास्त विकास होईल याबाबत आम्ही आशावादी असल्याचे सांगितले. यावेळी प्रवीण पाटणी, राहुल शिंदे, विशाल उदावंत, अनिकेत भडकवाडे, सचिन गायकवाड, योगेश अंभोरे उपस्थित होते.