अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा : स्नेहलताताई कोल्हे

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव मतदारसंघात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना घराबाहेर रहावे लागले असून त्यांच्यासमोर निवाऱ्याचे मोठे संकट निर्माण झाले आहे. या गंभीर परिस्थितीची तातडीने दखल घेऊन प्रशासनाने त्वरीत नुकसानग्रस्त भागाची पाहणी करावी, पंचनामे करावेत व बाधितांना तातडीने मदत पुरवावी अशी मागणी माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी केली आहे.

अतिवृष्टीमुळे कोपरगाव तालुक्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून सोयाबीन, कपाशी, ऊस, मका यांसह इतर पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. याशिवाय अनेक घरांमध्ये पाणी घुसल्याने घरगुती साहित्य, धान्यसाठा, जनावरे यांचेही नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर माजी आमदार कोल्हे यांनी प्रशासनाला तातडीची मदत कार्यवाही सुरू करण्याचे आवाहन केले आहे.मतदारसंघात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचा कष्टाचा घाम पावसाने वाहून गेला आहे. अशा वेळी प्रशासनाने तत्परतेने पंचनामे करून शेतकऱ्यांना व नागरिकांना योग्य त्या नुकसानभरपाईचा दिलासा द्यावा. सध्या अनेक ठिकाणी सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे ओढे नाले पुलावरून पाणी वाहून काही ठिकाणी लोकवस्तीचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.आवश्यक असले तिथे नुकसानग्रस्तांसाठी प्रशासनाने मदत मोहीम राबवत अन्न,

पिण्याचे पाणी, आरोग्यसेवा याची सोय करावी, असेही कोल्हे यांनी स्पष्ट केले.कोल्हे यांनी यावेळी शेतकरी आणि नागरिकांना धीर देत प्रशासनाशी सतत संपर्कात राहून मदत पोहचविण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे मत व्यक्त केले आहे. तातडीने मदतकार्य सुरू करून कोपरगाव मतदारसंघातील जनतेच्या संकटात सहभागी व्हावे, हीच खरी जनप्रतिनिधी म्हणून जबाबदारी आहे, असेही त्या म्हणाल्या.