नगर मनमाड महामार्ग पुणतांबा चौफुली परिसरात दुरुस्ती करा अन्यथा तीव्र आंदोलन करणार – वैभव आढाव

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव शहरालगत असलेल्या पुणतांबा चौफुलीजवळील रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली असून, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले आहेत. या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांचे जिवित धोक्यात आले आहे. नुकत्याच घडलेल्या दुर्दैवी अपघातात एका महिलेस आपला प्राण गमवावा लागल्याच्या पार्श्वभूमीवर, भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष वैभव आढाव यांच्या वतीने संबंधित विभागाकडे तातडीने दखल घेऊन रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.एकीकडे मतदारसंघाच्या विकासाचा भ्रमनिरास दिवसेंदिवस लोकप्रतिनिधी करत आहेत.कोट्यवधीच्या वल्गना झाल्या पण दुर्दैवाने कामे अतिशय निकृष्ट असल्याचा प्रकार समोर येतो आहे. या अपघातांचे दायित्व लोकप्रतिनिधींनी घ्यावे कारण त्यांच्या उदासीन धोरणामुळे सदर दुर्दैवी वेळ मतदारसंघाच्या नागरिकांना भोगावी लागते आहे याची जाणीव ठेवणे गरजेचे आहे.या स्थितीमुळे कोपरगाव भाजपा शहराध्यक्ष वैभव आढाव यांनी मा. कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग, नाशिक यांना पत्रव्यवहार केला आहे. या निवेदनात पुणतांबा चौफुली परिसरातील रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे वाहनांची वाहतूक अडथळाग्रस्त होत असून, अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

सदर रस्ता हा नगर मनमाड महामार्गाचा भाग असल्याने, त्याच्या देखभालीची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची आहे. मात्र, दीर्घकाळापासून या मार्गावरील दुरुस्तीचे काम पूर्णत्वास गेले नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. अपघातांमुळे जनतेत भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यातच पावसामुळे अधिक प्रमाणात अनेक वेळा दुचाकीस्वार, ज्येष्ठ नागरिक, महिला व विद्यार्थी यांना या खड्ड्यांमुळे धोका निर्माण झाला आहे.तरी, रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवून साईडपट्टीसह वाहतुकीसाठी सुरक्षित व्यवस्था करण्यात यावी आणि या संपूर्ण परिस्थितीची योग्य चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून उत्तरदायित्व निश्चित करण्यात यावे अशी मागणी आढाव यांनी केली आहे.जर दहा दिवसांत कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही तर , भारतीय जनता पार्टी कोपरगाव शहराच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.