कोपरगाव रेल्वे स्टेशनच्या गुड शेडचे काम वेळेत पूर्ण करा-आ.आशुतोष काळे

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव, राहाता तालुक्यासह शेजारील तालुक्याच्या शेतकऱ्यांना खरीप-रब्बी हंगामासाठी वेळेत खतांचा पुरवठा व्हावा यासाठी कोपरगाव रेल्वे स्टेशन येथे खतांचा साठा करण्यासाठी गुड शेड बांधण्याचे सुरु असलेले काम अतिशय संथ गतीने सुरु आहे.हे काम जलदगतीने करून वेळेत पूर्ण करा अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे विभागीय मॅनेजर राजेश कुमार वर्मा यांना दिलेल्या लेखी पत्रात केली आहे.कोपरगाव रेल्वे स्टेशनवर विविध कंपन्यांच्या खत साठा करण्यासाठी पूर्वीचे चार वॅगण क्षमतेचे गुड शेड उपलब्ध आहे. परंतु अधिकचा खत साठा उतरविण्यासाठी भारत सरकारच्या खत आणि रसायने मंत्रालयाने कोपरगाव रेल्वे स्टेशनवर खत रेक पॉइंट मंजूर केला असून कोपरगाव रेल्वे स्टेशनच्या परिसरात रेल्वे विभागाने नव्याने १७ वॅगण क्षमतेचे गुड शेड बांधण्याचे टेंडर मागील वर्षी रेल्वे विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आले होते. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर गुड शेड बांधण्याचे काम घेतलेल्या सबंधित ठेकेदाराकडून फेब्रुवारी महिन्यात काम देखील सुरु करण्यात आले आहे. परंतु आजपर्यंत ह्या गुड शेड बांधण्याचे काम पूर्ण झालेले नाही.काम सुरु करण्यात आल्यापासून दोन ते तीन महिन्यात गुड शेड बांधण्याचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते परंतु अतिशय संथ गतीने काम सुरु असल्यामुळे पाच महिन्याचा कालावधी पूर्ण होत आला असला तरी अजूनही हे काम पूर्ण होवू शकले नाही. खरीप हंगामाची तयारी करण्यासाठी पावसाळ्यापूर्वी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात खतांची मागणी होत असते.

त्यामुळे खत कंपन्या देखील मोठ्या प्रमाणात रेल्वे वॅगणने खतांचा पुरवठा करीत असतात. कोपरगाव रेल्वे स्टेशनवर १७ वॅगण खते येणार आहेत. परंतु १७ वॅगण खते ठेवण्यासाठी गुड शेड बांधण्याचे कामच पूर्ण झालेले नाही. पावसाळा जरी जून महिन्यात सुरु होत असला तरी यावर्षी मे महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसाने सर्वत्र दाणादाण उडवून दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर गुड शेड बांधण्याचे काम लवकरात लवकर पूर्ण होणे अत्यंत गरजेचे आहे.जर गुड शेड बांधण्याचे काम वेळेत पूर्ण झाले नाही तर १७ वॅगण खतांच्या गोण्या ह्या प्लॅटफॉर्मवरच उतराव्या लागणार आहे.सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु असून खते ही हायड्रोग्राफिक उत्पादने असल्याने, मुसळधार पावसामुळे खताच्या गोण्या ओल्या होवून अनलोडिंग दरम्यान व्यापारी आणि खत कंपन्यांचे मोठे नुकसान होवू शकते व त्याचा परिणाम कुठेतरी शेतकऱ्यांना वेळेवर आणि पुरेशा प्रमाणात खते उपलब्ध होण्यावर होणार आहे. त्यासाठी कोपरगाव रेल्वे स्टेशनवर सुरु असलेले गुड शेड बांधण्याचे लवकरात लवकर पूर्ण करावे असे आ.आशुतोष काळे यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे.