स्वयंशिस्त, आत्मविश्वास आणि ध्येयाच्या जोरावर आयुष्य घडते -बिपीनदादा कोल्हे
संजीवनी युवा प्रतिष्ठानचा रोजगार महोत्सव उत्साहात संपन्न

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
आजच्या पिढीची युवाशक्ती हुशार आणि तंत्रज्ञानाने युक्त आहे, कुठल्याही क्षेत्रातील नोकरी मिळवितांना स्वयंशिस्त, आत्मविश्वास आणि ध्येयाच्या जोरावर युवक सामोरे गेल्यास त्यात निश्चित यश मिळते असे प्रतिपादन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी केले. युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या संकल्पनेतून संजीवनी युवा प्रतिष्ठान आयोजित रोजगार मेळावा उत्साहात पार पडला असून शेकडो युवकांना एम.एन.सी कंपन्यांमध्ये रोजगाराची संधी या माध्यमातून मिळाली आहे.संजीवनी युवा प्रतिष्ठानच्यावतीने कारखाना कार्यस्थळावर बुधवारी नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यांत आले होते त्याचे उदघाटन क्रेडाईचे अध्यक्ष उद्योजक राजेश ठोळे यांच्या हस्ते करण्यांत आले त्याप्रसंगी ते अध्यक्षपदावरून बोलत होते. माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या प्रतिमेचे पुजनही यावेळी करण्यांत आले.सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांच्या संकल्पनेतुन नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यांत आले असुन त्याचे हे दुसरे वर्ष असल्याचे अमृत संजीवनी शुगरकेन संस्थेचे अध्यक्ष पराग संधान यांनी सांगितले. मानव संसाधन विकास अधिकारी विशाल वाजपेयी यांनी युवकांना मुलाखत तंत्र, स्वतः बददलची माहिती, मुलाखतीत काय माहिती द्यावी, कशाबददल बोलु नये, परिसरासह दैनंदिन सामान्यज्ञान, पेहराव कसा असावा, ज्या कंपनीसाठी मुलाखत द्यायची त्यांची माहिती इत्यादी छोटया छोटया गोष्टींची माहिती दिली. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष राजेंद्र कोळपे, संजीवनी युवा प्रतिष्ठानचे सिध्दार्थ साठे यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रतिष्ठान उपक्रमाची माहिती दिली. राजेश ठोळे याप्रसंगी बोलतांना म्हणाले की, कोपरगांव सारख्या ग्रामिण भागात सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे युवा अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांनी पुणे मुंबई आदी शहरातील मल्टीनॅशनल कंपन्यांचे प्रतिनिधींना बोलावून येथील सुशिक्षीत बेरोजगारांच्या हाताला काम कसे मिळेल हा विशाल दृष्टीकोन ठेवुन सलग दुस-यावर्षी नोकरी महोत्सवाचे आयोजन केले, त्यांचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे.

बिपीनदादा कोल्हे पुढे म्हणाले की, सुशिक्षीत बेरोजगारांनी आयुष्यात प्रत्येक स्पर्धेला सामोरे जातांना आत्मविश्वास बाळगला पाहिजे. आत्मसात केलेल्या ज्ञानाच्या जोरावर नोकरी मिळवितांना चिकाटी ठेवावी. आई वडील गुरूजन यांनी आपल्याला जे जे शिकवले त्याचा दैनंदिन व्यवहारात काम करतांना उपयोग करावा. ग्रामिण भागातील मुला मुलींमध्ये ध्येय आहे त्यामुळे शहरी भागातील मुलांशी स्पर्धा करतांना मनांत कधीही भिती बाळगू नये. रोजगार वाढीसाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धोरणात्मक निर्णय घेतले आहे., युवकांना उद्योजक होण्यासाठी स्टार्ट-अप्सच्या माध्यमांतुन चालना देण्यांचे मोठे काम केले आहे. नोकरी मिळाली नाही मागून कुणीही निराश होवु नये, प्रयत्न करीत रहा निश्चित त्याला यश येईल. मिळालेल्या संधीचे सोने करा, पुर्वी आपण प्रगत देशाच्या तंत्रज्ञानावर अवलंबुन होतो आता मात्र परिस्थिती बदलली आहे. भारत देश आणि त्यातील युवा शक्तीवर जगाचे लक्ष लागले आहे. येथील युवाशक्तीच्या हातात स्कील आहे. येथील सुशिक्षीत बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे या उद्देशाने ग्रामीण भागातील राज्यातील पहिले बीपीओ कॉल सेंटर संजीवनीने सुरू केले असेही ते शेवटी म्हणाले.याप्रसंगी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब वक्ते, प्रभारी कार्यकारी संचालक तथा साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, खाते प्रमुख, उपखातेप्रमुख, युवासेवक रोहित कनगरे, कार्यकर्ते उपस्थित होते. भाजपा तालुकाध्यक्ष विशाल गोर्डे यांनी आभार मानले.