Breaking
गोदावरी दूध संघ

वारकरी सांप्रदायाची भक्ती चळवळीतील स्थान युगानुयुगे अढळ – मीराबाई मिरीकर

[wps_visitor_counter]

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव 

भक्ती चळवळीची पताका प्रत्येक संतांनी आपापल्या खांद्यावर घेऊन वेगवेगळे तत्वज्ञान समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला असला तरी महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाने भक्ती चळवळीतील आपले स्थान आजतागायत अढळ ठेवलेले आहे. या सांप्रदायातूनच सामाजिक आणि आध्यात्मिक समता, मानवता, सदाचाराची शिकवण माणसाला मिळाली असल्याचे विचार ह.भ.प. मीराबाई मिरीकर यांनी संवत्सर येथे आयोजित किर्तनाद्वारे व्यक्त केली.कोपरगांव तालुक्यातील संवत्सर येथे ऋषीपंचमी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या किर्तनातून ह.भ.प. मीराबाई मिरीकर भावीक श्रोत्यांना मार्गदर्शन करताना बोलत होत्या.गोदावरी नदीमध्ये ऋषीपंचमीनिमित्त लाखो महिला भाविकांनी स्नानांची पर्वणी साधली. त्यानंतर ह.भ.प.मीराबाई मिरीकर यांचे शनी महाराज मंदिराच्या प्रांगणात किर्तन आयोजित करण्यात आले होते. प्रारंभी गोदावरी खोरे दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील यांनी ग्रामस्थांच्या वतीने मीराबाईंचा सत्कार करून उपस्थितांचे स्वागत केले. प्रकृती बरी नसतानाही मीराबाईंनी संवत्सरला येवून किर्तन सेवा दिली. कीर्तनापूर्वी जिल्हा परिषद शाळेच्या आवारात मीराबाईंच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.तसेच प.पूज्य रामदासी महाराज व आदरणीय नामदेवराव परजणे आण्णा यांना दरवर्षी ऋषीपंचमीच्या दिवशी संवत्सरला येऊन किर्तन सेवा देण्याचे वचन मी दिलेले आहे. त्या वचनाची प्रतारणा होऊ नये म्हणून आजही संवत्सरला येऊन किर्तन सेवा देत असल्याचे मीराबाई यांनी यावेळी सांगताच उपस्थित सर्वच श्रोते भाऊक झाले होते. किर्तनात मीराबाई पुढे म्हणाल्या, संतांनी आपल्या आचार विचारातून मानवी मूल्यांचा मांडलेला विचार आदर्शवत असल्याने लोकजीवनावर त्या विचारांचे चांगले संस्कार झालेले आहेत. ‘ जनी जनार्दन ‘ या सहज विचारातून सामाजिक प्रगतीचा देखील संतांनी विचार केलेला आहे. वारकरी सांप्रदायाने ज्ञानाचे महत्व मान्य करून भक्तीला अग्रस्थान दिलेले आहे. त्यासाठी नामसंकीर्तनासारखे अतिशय सोपे साधन लोकांना उपलब्ध करून दिले. आपल्याकडे आध्यात्मज्ञानाची आणि साधनेची परंपरा तशी खूप प्राचिन आहे. तत्वज्ञान आणि जीवन जगण्याच्या पध्दतीला ही परंपरा पुरक आहे. समाजव्यवस्थेचे खरे चित्र या परंपरेतूनच स्पष्ट होते. समाजातील विषमता दूर सारून सामाजिक व पारमार्थिक वाटा स्वच्छ करण्यासाठी देखील या परंपरेचे मौलिक योगदान आहे. आजच्या धावपळीच्या परिस्थितीत आध्यात्माबरोबरच विज्ञानाची आवश्यकता नक्कीच आहे. परंतु अलिकडे विज्ञानाचा विपर्यास मोठ्या प्रमाणावर होताना दिसून येतो. नवनवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करताना आपल्या सभोवतालचे सुंदर जगच माणूस विसरत चालला आहे.

जाहिरात

माणुसकी मृतवत झाली आहे. यातून सावरायचे असेल तर संतांच्या चरित्रांचे वाचन आजच्या पिढीने केले पाहिजे. रोजच्या व्यावहारिक जीवनात आध्यात्मालाही महत्व देऊन व्यवहारिक कर्तव्यनिष्ठेला व सामाजिक नीतिमत्तेला पोषक ठरतील अशीच कर्मे माणसाने केली पाहिजेत. यानंतर ह.भ. प.विनायक महाराज वाघ यांनी मार्गदर्शन करताना महाराष्ट्र ही संतांची पवित्र व पावन भूमी आहे. संस्काराचा संपन्न व समृध्द वारसा या भूमीने मराठी मनाला दिलेला आहे. वारकरी सांप्रदायामध्ये व्रत, वैकल्याचे स्तोम नाही. कर्मठपणाही नाही. तर त्यात त्याग, भोग, स्वधर्माचरण यांचा सुरेख मेळ घालण्याचा उपदेश आहे. अद्वैत भक्ती, ज्ञान, उपासना श्रध्दा आणि विवेक यांच्या एकात्मतेवर संतांनी अधिक भर दिलेला असून त्यांची वृत्ती नेहमीच लोकाभिमूख होती असे सांगून प.पू.वाघ महाराज यांनी पुढे सांगितले की, धर्म ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब असली तरी, तिला नीती व तत्वज्ञानाची जोड प्रत्येक धर्माने दिली पाहिजे.अनासक्त माणसांनी लोकोध्दाराच्या कार्यात समर्पित भावनेने कार्य केले पाहिजे हीच शिकवण वारकरी सांप्रदायाने आपल्याला दिलेली आहे. हा सांप्रदाय प्रत्येकाने अंगिकारण्याची आवश्यकता आहे. ऋषीपंचमीनिमित्त गोदावरी नदीत स्नानाची पर्वणी साधण्यासाठी महिलांनी प्रचंड गर्दी केलेली होती. समाधानकारक पावसामुळे यंदा नदीला दुथडी भरुन पाणी वाहत असल्यामुळे संपूर्ण गोदाकाठ भक्तीमय झालेला होता. संवत्सरला श्री क्षेत्र पंढरीचे स्वरूप प्राप्त झाले होते. त्यातच किर्तन श्रवणाचा लाभ मिळत असल्याने औरंगाबाद, नाशिक, अहमदनगर अशा विविध ठिकाणावरून भावीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाप्रसादाने या धार्मिक सोहळ्याची सांगता झाली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
[wps_visitor_counter] [sp_wpcarousel id="1375"]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »