दस्त नोंदणी शुल्क माफ करून महायुती शासनाचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा – आ.आशुतोष काळे

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
महायुती शासनाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी शेतजमिनीच्या वाटणीपत्राच्या दस्तास लागणारी नोंदणी फी माफ करण्याचा घेतलेला निर्णय संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाचा आणि दिलासादायक आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या पार पडलेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय जाहीर करण्यात आला असून शेतकऱ्यांना फायदा व्हावा यासाठी सरकारने दस्त नोंदणी शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वसामान्य जनतेच्या हिताचा विचार करणाऱ्या महायुती शासनाने शेतकऱ्यांसाठी देखील दस्त नोंदणी शुल्क माफ करण्याचा अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेवून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.ग्रामीण भागात एकत्र कुटुंब पद्धतीमुळे कुटुंबातील एका व्यक्तीच्या नावावर असलेली शेतजमीन कुटुंब विभक्त झाल्यानंतर कुटुंबातील इतर व्यक्तीच्या नावावर करणे अपरीहार्य असते. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीची आपापसात स्वखुशीने जरी वाटणी करायची असेल तर किंवा शेत जमीन एका व्यक्तीच्या नावावरून दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर करण्यासाठी एकूण रेडीरेकनरच्या एक टक्के किंमत मोजावी लागत होती. हा मोठा खर्च टाळण्यासाठी कित्येक शेतकरी दस्तांची नोंदणी टाळत होते व बहुतांश वेळा अनेक कुटुंब समन्वय ठेवून कुटुंबाची शेत जमीन हि मोजक्याच व्यक्तींच्या नावावर ठेवत होते.परंतु कुटुंबातील इतर व्यक्तींच्या नावे नोंदणीच नसल्याने भविष्यात शेत जमिनीच्या बाबतीत कुटुंबात कलह, वाद निर्माण होवून पुढे कायदेशीर वाद व पेच प्रसंग निर्माण होवून त्याचा शेतकऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना नाहक त्रास भोगावा लागतो.

याबाबत महायुती शासनाने यावर तोडगा काढण्यासाठी व शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासातून कायमची मुक्तता करण्यासाठी महसूल विभागाने शेतजमिनीच्या वाटणीपत्राच्या दस्तास लागणारे नोंदणी शुल्कच माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाच्या या महत्वपूर्ण निर्णयामुळे शेतकऱ्यांना वाटप पत्राची नोंदणी सहजपणे करता येणे यापुढे शक्य होणार असून त्याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक भार तर कमी होईलच त्याच बरोबर जमिनीच्या वादातून कुटुंबात वाद देखील निर्माण होणार नाहीत असा दुहेरी फायदा होणार आहे. त्याबद्दल आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव मतदार संघातील शेतकऱ्यांच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे, महसूल मंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार मानले आहेत.