नांदूर मध्यमेश्वर व पालखेड कालव्यांतून गावतळे व शेततळे भरुन द्या
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आ.आशुतोष काळेंची मागणी

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक गावात तीव्र पाणी टंचाई जाणवत असून नागरिकांच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.हि पाणी टंचाई दूर करण्यासाठी नांदूर मध्यमेश्वर जलद कालवा, पालखेड कालवा तसेच डाव्या, उजव्या कालव्यातून गावतळे व शेततळे भरून द्या अशी मागणी करून मतदार संघातील विविध प्रश्न जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आ. आशुतोष काळे यांनी मांडले. त्यावेळी पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पा.यांनी याबाबत तातडीने कार्यवाही केली जाईल अशी ग्वाही दिली असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.अहिल्यानगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पंडीत जवाहरलाल नेहरू सभागृहात रविवार (दि.११) रोजी जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पा. यांच्या अध्यक्षतेखाली ‘जिल्हा नियोजन समिती’ची बैठक पार पडली.
यावेळी आ.आशुतोष काळे बोलत होते.यावेळी बोलतांना ते पुढे म्हणाले की, फेब्रुवारी महिन्यापासून उन्हाच्या झळा जाणवत असल्यामुळे कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाल्यामुळे या गावातील गावतळे व शेततळे नांदूर मध्यमेश्वर जलद कालव्यातून व पालखेड कालव्यातून भरून द्यावीत त्यामुळे पावसाळा सुरु होईपर्यंत या गावातील नागरीकांचा व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.तसेच मतदार संघातील विविध प्रश्न मांडताना त्यांनी सांगितले की,कोपरगाव मतदारसंघातील रस्त्यांची दर्जोन्नती करण्यासाठी तातडीने मंत्रालय स्तरावर विशेष बैठक आयोजित करण्यात यावी. जलजीवन प्राधिकरणाने २०११ च्या लोकसंख्येनुसार पाणीपुरवठा योजना केल्या असून त्यानंतर बराच मोठा कालावधी उलटला असून वाढलेल्या लोकसंख्येचा विचार करता या पाणी पुरवठा योजनेतून अपेक्षित पाणीपुरवठा होणार नाही. त्यासाठी सुरु असलेल्या जलजीवन योजनेच्या पाणीपुरवठा योजना वाढीव लोकसंख्येनुसार करण्यात याव्यात.

जिल्हा नियोजन अंतर्गत कोपरगाव मतदारसंघातील विविध विकासकामांना निधी मिळावा आदी मागण्या आ.आशुतोष काळे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केल्या.त्यावेळी पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पा. यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.यावेळी जिल्हाधिकारी पंकज आशिया, पोलीस अधिक्षक राकेश ओला, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, पर्यावरण विभाग सचिव दराडे, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आ.मोनिकाताई राजळे, आ.किरण लहामटे, आ. किशोर दराडे, सत्यजित तांबे, आ.काशिनाथ दाते, आ. विठ्ठलराव लंघे,आ.अमोल खताळ,आ.विक्रम पाचपुते,आ.हेमंत ओगले आदींसह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व अधिकारी यावेळी उपस्थित होते.