मोठे होवून आई-वडील शिक्षक संस्थेचे नाव उंचवा हीच खरी कर्मवीरांना आदरांजली-आ.आशुतोष काळे

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
शेतकरी, कष्टकरी,गोर गरिबांच्या मुलांना शिक्षणाची सोय व्हावी यासाठी कर्मवीर भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. कर्मवीरांच्या आदर्श विचारांवर कर्मवीर शंकररावजी काळे यांनी या शिक्षण संस्थेचा शाखा विस्तार करून खेड्यापाड्यात शाळा महाविद्यालय उभी केली.या रयत शिक्षण संस्थेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करावा. आवडत्या क्षेत्रामध्ये आपलं नाव मोठे करून आपले आई-वडील शिक्षक व आपल्या रयत शिक्षण संस्थेचे नाव उंचवावे हीच खरी कर्मवीरांना आदरांजली ठरेल असा बहुमोल संदेश रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागीय अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी दिला.कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव-कोळपेवाडी येथील रयत संकुलात श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, राधाबाई काळे कन्या विद्यामंदिर व श्री छत्रपती संभाजी प्राथमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा १३७ वा जयंती सोहळा व गुणवंत विद्यार्थी पारितोषिक वितरण कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. यावेळी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना आ.आशुतोष काळे बोलत होते.यावेळी प्रमुख अतिथी मा.आ.डॉ.सुधीर तांबे व प्रसिद्ध व्याख्याते प्रा.प्रशांत खामकर उपस्थित होते.यावेळी मा.आ.सुधीर तांबे म्हणाले की, बहुजन समाजाला शिक्षित करण्याचे काम कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केले. रयत शिक्षण संस्थेच्या विस्तारात कर्मवीर शंकररावजी काळे यांचा मोठा वाटा आहे. जिल्ह्यात अनेकांनी स्वत:च्या शिक्षण संस्था काढून शिक्षण सम्राट झाले परंतु कर्मवीर शंकररावजी काळे यांनी फक्त रयत शिक्षण संस्थाच वाढविली. ते महान व प्रेमळ व्यक्तिमत्व होते त्यांचे प्रेम मला देखील मिळाले. बहुजन समाज शिक्षणाशिवाय पुढे जावू शकत नाही. शिक्षणाने आत्मभान निर्माण होते व आपण कोण आहोत याची देखील जाणीव होते. त्यामुळे शिक्षकांनी पुस्तकी ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांना समाजात कसे वागले पाहिजे हे देखील शिकविले पाहिजे असे मत व्यक्त करून रयत मध्ये शिकणारे सर्व विद्यार्थी भाग्यवान असल्याचे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा.प्रशांत खामकर म्हणाले की, रयत शिक्षण संस्था ही कर्मवीर आण्णा व लक्ष्मीबाई यांच्या त्यागावर उभी राहिली असून कर्मवीर भाऊराव पाटील हे रयत पंढरीचे विठ्ठल तर लक्ष्मीबाई ह्या रखुमाई व रयतचे सर्व सेवक व विद्यार्थी हे या रयत पंढरीचे वारकरी आहेत. कर्मवीर आण्णांचे हे कार्य पुढे चालू ठेवण्याचे काम कर्मवीर शंकररावजी काळे, मा.आ.अशोकराव काळे व त्यानंतर आ.आशुतोष काळे यांनी अखंडपणे सुरु ठेवले आहे. राज्याचे शिक्षण राज्यमंत्री असतांना संपूर्ण जिल्ह्यात कर्मवीर शंकररावजी काळे आपल्या शिक्षण संस्था सहजपणे उभ्या करून स्वत:चे साम्राज्य निर्माण करू शकले असते. परंतु त्यांनी फक्त रयत शिक्षण संस्था मोठी केली. रयत शिक्षण संस्था त्यागावर उभी राहिलेली असून रयतेसाठी त्याग करणे हे मोजक्याच कुटुंबांच्या रक्तात असून यामध्ये काळे कुटुंबाचे नाव अग्रभागी असल्याचे आपल्या भाषणात प्रा.प्रशांत खामकर यांनी सांगितले.या प्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे व्हा,चेअरमन शंकरराव चव्हाण, संभाजीराव काळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कचरू कोळपे, स्कुल कमिटी सदस्य शिवाजीराव वाबळे,सुरेगावच्या सरपंच सौ.सुमनताई कोळपे, राष्ट्रवादीच्या युवती तालुकाध्यक्षा सौ.वैशाली आभाळे, डॉ. आय.के.सय्यद,माजी प्राचार्य सुरेश कातकडे, अविनाश शिंदे आदी मान्यवरांसह रयत संकुलातील सर्व शिक्षक, शिक्षिका, कार्यालयीन सेवक विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य प्रकाश चौरे यांनी केले. स्वागत मुख्याध्यापक राजेंद्र पाचोरे यांनी केले. सूत्रसंचालन श्रीमती.रोहिणी म्हस्के व रजामुराद शेख यांनी केले तर आभार प्राचार्या सौ.हेमलता गुंजाळ यांनी मानले.