निळवंडेच्या आवर्तनातून १५ गावातील सर्व बंधारे भरून घ्या आ.आशुतोष काळेंच्या अधिकाऱ्यांना सूचना

संपादक बिपीन गायकवाड महाराष्ट्र माझा न्यूज कोपरगाव
निळवंडे कालव्याच्या आवर्तनातून पंधरा गावातील सर्वच बंधारे भरून घ्या अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना दिल्या.आ.आशुतोष काळे यांनी नुकतीच निळवंडे कालव्याच्या आवर्तनाच्या पार्श्वभूमीवर निळवंडे कालवे व पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली.यावेळी अधिकाऱ्यांना सूचना करतांना त्यांनी सांगितले की,हाडोळा पॉईंट व डांगेवाडी पॉईंट येथे एस्केप बांधा तसेच डांगेवाडी, हाडोळा पॉईंट व इतर ठिकाणाहून पाणी सोडून कोपरगाव तालुक्यातील पश्चिम भागातील पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरून घ्या. कोपरगाव मतदार संघातील वाकडी,लांडेवाडी पॉईंट, चितळी-धनगरवाडी पॉईंट येथून पाणी सोडून सर्व बंधारे पूर्ण क्षमतेने भरून द्या.कोपरगाव तालुक्यातील काही बंधाऱ्यांना भौगोलिक परिस्थितीमुळे निळवंडे कालव्यांच्या चाऱ्यांमधून पाणी भरणे शक्य नाही.

त्यामुळे हे बंधारे उजनी उपसा जलसिंचन योजनेच्या माध्यमातून भरावे लागणार आहे. त्यासाठी उजनी योजनेच्या किरकोळ दुरुस्तीचे राहिलेले काम तातडीने पूर्ण करा अशा सूचना यावेळी आ.आशुतोष काळे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.कोपरगाव मतदार संघात पावसाचे प्रमाण अत्यल्प असून मागील काही दिवसापासून पावसाने उघडीप दिली आहे. अद्यापही मोठ्या पावसाची प्रतीक्षा असून निळवंडे कालव्याच्या आवर्तनातून बंधारे भरून घेतल्यास कोपरगाव मतदारसंघातील या पंधरा गावात निर्माण झालेली अडचण दूर होणार असून खोलवर गेलेली भूजल पातळी भरून येण्यास मदत होणार आहे.त्याचा या पंधरा गावातील शेतकरी व नागरिकांना लाभ होणार आहे.त्यामुळे या पंधरा गावातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.यावेळी निळवंडे कालव्याचे उपविभागीय अभियंता महेश गायकवाड, शाखा अभियंता संदीप साबळे, पंचायत समिती अभियंता अश्विन वाघ आदी उपस्थित होते.